Saturday, March 30, 2013

भूक लागली … खूप पर्याय आहेत

भूक लागली … खूप पर्याय आहेत

त्या दिवशी Maharashtra Times मधला लेख वाचला "कल्याणची खाऊगल्ली". त्यात खिडकी वडा, निलेश पाणीपुरी, पारनाक्यावरची पावभाजी अश्या बऱ्याच ठिकाणांची माहिती आहे. त्यात आणखी गोष्टींची भर घालावी म्हणून हा लेख -

कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौकाकडे जाताना मध्ये हॉटेल लागत  "इच्छादेवी ". होटल लहानच आहे. पण प्रसिध्द आहे ते कांदाभजी साठी.

अहिल्याबाई चौकात पाणीपुरीच्या २ गाड्या लागतात. त्यावर संध्याकाळी खूप गर्दी असते. सुभाष मैदानं समोर संध्याकाळी वडापाव, भजी ची गाडी लगते. गाडीभोवती एवढी गर्दी असते की कधीकधी गाडी पण नाही दिसत. गाडीच नाव पण बरोबर शोभत तिला " फ़ेमस वडापाव".

सकाळी नाश्ता करायचा तो ही  मित्रांबरोबर तर मिसळ पाव शिवाय पर्याय नाही. टिळक चौकात सुरभी म्हणून छोट हॉटेल आहे. तिथे मिसळ पाव, वडा  पाव, पोहे वगैरे पदार्थ मिळतात. पण मजा येते ती मिसळ खायला. पुणेरी तिखट मिसळ. ही मिसळ प्रसिद्ध आहे ती जन्याची मिसळ म्हणून. तिखट मागितली की धूर निघालाच म्हणून समजा …. गांधी चौकात हरी विठ्ठला ची मिसळ पण तशीच प्रसिद्ध आहे. ह्या दोघां व्यतिरिक्त आणखी एक मिसळ प्रसिद्ध आहे  ती म्हणजे लोकमान्य हॉटेल मधली.

पारनाक्या जवळ अखिलेश पाणीपुरी वाल्याकडे नेहमी गर्दी मिळेल. त्याच्याकडे पाणीपुरी खायची आणि नंतर समोर कावरे आईस क्रीम खायचं. व्वा … समोसा खावा तर ठक्कर चा. टिळक चौकात ठक्कर फरसाण वाल्याच दुकान आहे. त्याच्याकडे फक्त सकाळीच सामोसा मिळतो. पहिल्या फटक्यात तुमचा नंबर लागला तर नशिब. नाहीतर वाट बघण आलच. त्याच्याकडची चटणी तर अप्रतिम.

संध्याकाळी लाल चौकीला जाताना तेलवणे हॉस्पिटल जवळ एका गाडीवर खूप गर्दी दिसते आणि येणाऱ्या  सुगंधामुळे राहवत नाही. ती गाडी म्हणजे पवार मुगभजी. एकदा खाऊन बघा बाकी सगळ विसराल. त्याशिवाय रामबागेत गेलात तर अंबर चा वडापाव पण प्रसिद्ध. त्याच्या वड्याला खरी चव येते ती त्याच्याकडच्या  चटणीमुळे.

बघा आणखी काय आठवत का आणि सांगा तुमच्याकडे काय काय प्रसिद्ध आहे ते ….


Thursday, February 21, 2013

देव दिवाळी !!!

देव दिवाळी !!!

 देव दिवाळी साठी गावाला जायचं ठरलं. म्हणून  सकाळची मांडवी पकडली  आणि संगमेश्वर ला पोहोचलो. त्या दिवशी घरीच राहायच होत. संध्याकाळी देवाची पूजा केली आणि  फटके फोडले.

दुसऱ्या दिवशीचा प्लान मात्र आधीच ठरला होता. सकाळी लवकर निघायचं आणि गणपतीपुळ्याला आणि मार्लेश्वर ला जायचं. तसं  लवकर निघायचं होत पण कसलं जमतंय. निघे  पर्यंत १० वाजले. दिवसभर गाडी घेतली होती भाड्याने. फक्त गाडीच कारण उदय काकाच गाडी चालवणार होते. घरच्याच झाडाची जास्वंदाची फुले घेतली होती. वाटेत जाम भूक लागली होती म्हणून काकांनी एका हॉटेल मध्ये नेले. हॉटेल सन राइस .... मस्त मिसळ पाव हाणला आणि पुढे निघालो.

अंतर फक्त २ तासाचच होत. पण मधेच गाडी बंद पडली ती पण चढणावर ..... मग काय सगळ्यांचीच कसरत. काका गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करत होते, मी आणि भावेश तिला धक्का मारण्याचा !!!  प्रयत्नच होता तो कारण जसे काका क्लच सोडायचे गाडी मागे जायची. मग आम्हीपण तिच्या बरोबर मागे मागे ....  मी गाडीवाल्यावर थोडी शाब्दिक  फुले उधळली (पण मनातच) ... पण काकांनी शेवटी सुरु केली गाडी एकदाची. आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

गणपतीपुळ्याला पोहोचे पर्यंत १ वाजून गेला होता. देवाचे दर्शन मस्त झाले. जेवायची वेळ झाली होती म्हणून हॉटेल मधे जाणार होतो तर काका म्हणाले  इथे गुरुजींकडे अप्रतिम जेवण मिळत. काकांच्या ओळखीचे एक गुरुजी होते. त्या बापट गुरुजींकडे जेवलो.  सुंदर..... खरच अप्रतिम जेवण होत. आमटी भात, पोळी , भाजी . मोदक आणि त्यावर तुपाची धार. व्वा !!!. काय मोदक होते ते !!!

पुढचा टप्पा होता मार्लेश्वर .... पण संगमेश्वर ला  थोडी खरेदी पण करायची होती. म्हणून प्लान चेंज  केला आणि संगमेश्वर ला आधी गेलो.  संगमेश्वरचा  फरसाण खूप मस्त मिळतो.  तो घेतला.  मुंबई ला पण आणायचा होता तसं दादाने सांगितलं  होत कारण गेल्यावेळी आणला होता तो त्याला खूप आवडला होता.

आणि मग निघालो मार्लेश्वरला .... वाटेत सोळजाई च दर्शन घेतलं. मार्लेश्वर ला जाई  पर्यंत संध्याकाळचे  ६ वाजले. काळोख पण झाला होता. मार्लेश्वाराचे देऊळ डोंगरावर आहे. तस ते देऊळ नाही. एका गुहेत शंकराची पिंडी  आहे. चढायला निघालो तो पर्यंत तर वाटेतली दुकाने पण बंद झाली होती. जवळ जवळ ६०० पायऱ्या आहेत. आम्ही वर जाणारे शेवटचेच होतो. मार्लेश्वराचे दर्शन घेतले. असा म्हणतात की कधीतरी त्या गुहेत नाग पण दिसतो. आम्हाला नाही दिसला.

आमच दर्शन झाल आणि पुजाऱ्याने देऊळ बंद केल. तिथल्याच एका माणसा बरोबर खाली येत होतो. त्याला विचारले, "पायऱ्यांवर स्ट्रीट लाईट आहेत पण मग चालू का नाहीत."  त्याने माहिती दिली की ते माकडांनी फोडले आहेत. आम्ही त्याला बोललो "आम्हाला तर नाही दिसली माकडं." भक्ती आणि प्रियांका थोड्या घाबरल्या माकडं म्हटल्यावर . मग तो म्हणाला "रात्री माकडं नाही येत कारण त्यांना वाघाची भीती असते,"  हे असं कारण सांगतात का कोणी. आम्ही घाबरल्याचे दाखवत नव्हतो पण थोडे घाबरलोच होतो.

तिथून थेट घरी गेलो. आणखी दोन दिवस गावालाच आराम केला आणि नंतर पुन्हा मुंबईच्या प्रवासाला सुरुवात केली.